पुणे : ‘वडिलधाऱ्यांचा आदर करणे ही भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. मात्र, आज दुर्दैवाने अनेकदा तरुणपिढीत त्याचा अभाव दिसतो. छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडचिड होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे जीवनाचा आनंद घेता येत नाही. सकारात्मक विचार आणून, त्रासून न जाता आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपल्यासह इतरांचेही जीवन आनंदी बनेल,’ असे मत प्रसिद्ध लेखक नरेंद्र गोईदानी यांनी व्यक्त केले.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे आयोजित पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमध्ये नरेंद्र गोईदानी यांच्या १२ मराठी आणि १२ इंग्रजी अशा २४ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संदीप तापकीर उपस्थित होते.
नरेंद्र गोईदानी म्हणाले, ‘सुरुवातीच्या काळात मुले मोठ्यांचा आदर करायची; परंतु आजची पिढी मोठ्यांना आदर देत नाही. स्वतःच्या विश्वात ते अधिक रमतात. त्यांच्या विचारांचा माणूस असला, तर ते त्यांना आदर देतात. इतरांच्या विचारांचाही आदर करता आला पाहिजे. चांगली पिढी घडली तरच चांगला समाज घडेल आणि हे सर्व घडवून आणायचे असेल तर पुस्तकांची आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पुस्तके आपण वाचली पाहिजेत.’
विशाल सोनी म्हणाले, ‘एकाच वेळी मराठीची तीस आणि इंग्रजीची तीस पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रयत्न आम्ही केला. मराठी प्रकाशन विश्वात हे एक वेगळे पाऊल असून, ही सगळी पुस्तके आपल्याला वाचनातील वैविध्याचा अनुभव देतील.’
संदीप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले.